मुख्याध्यापक संदेश

मुख्याध्यापक संदेश

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वटवृक्षाच्या अनेक शाखा मधील श्री जयरामभाई विद्यामंदिर प्राथमिक शाळा, नाशिकरोड ही प्राथमिक शाळा आहे. १९४७ साली सुरु झालेल्या ह्या शाळेच्या मुख्याध्यापक पदाची धुरा २००४ पासून सांभाळत असतांना संस्थेचे आदरणीय सचिव सर.डॉ.मो.स.गोसावी सर, अध्यक्ष माननीय प्रिं.श्री.एस.बी.पंडित सर यांचे आशिर्वाद आणि संस्थेच्या एच.आर.डायरेक्टर प्राचार्या डॉ. दिप्ती देशपांडे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभत आहे.

           संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून “समाजातील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण मूल्यवर्धित शिक्षण देणे” हे ध्येये समोर ठेवून शाळेची वाटचाल यशाकडे होत आहे.

मुल म्हणजे आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. मुलाचं शिक्षण आणि व्यक्तीमत्त्व विकास म्हणजे राष्ट्राच्या भावी विकासाची पायाभरणी म्हणून, समाजातील प्रत्येक मुल शाळेत यावं त्याने चांगलं शिकावं हे आमचे एकमेव मिशन आहे. त्यासाठी आमच्या शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आपल्या कामाचे उत्तम नियोजन करतात, आनंदाने मनापासून काम करतात, वेळोवेळी आपल्या कार्याचे मूल्यमापन करतात आणि गरजेनुसार कार्यपद्धतीत बदल करून कार्य सफलतेचा आनंद घेतात,‘कामातून आनंद आणि आनंदाने काम’ हा आमचा मूल मंत्र आहे हा मूलमंत्र शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी हातभार लावत आहे.

      शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शिक्षक आणि पालकांतील सुसंवाद विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती उत्तरदायित्व वाढवतो म्हणूनच पालक संघ, मातापालक संघ,शालेय व्यवस्थापन समिती यांच्या मार्फत शिक्षक आणि पालक एकमेकांच्या सहकार्याने कार्ययोजना तयार करून गुणवत्तापूर्ण शिक्षण आमच्या शाळेतून दिले जात आहे.

    आमची भूमिका प्रामुख्याने बालकाला दर्जेदार शिक्षण देऊन त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे ही असल्यामुळे शाळेतील वातावरण आणि परिसर ह्या त्यापद्धतीने ठेवला जात आहे. त्यामध्ये विध्यार्थ्यांना शाळेत विविध उपक्रम,प्रकल्प,स्पर्धा परीक्षा ह्या माध्यमातून अनुभव देऊन विद्यार्थ्यांना इतर घटकांशी सकारत्मक आंतरक्रीया घडवून आणली जात आहे. त्यासाठी आमचे शिक्षक बालसुलभ व बालकेंद्रित शिक्षणपद्धती ज्ञानरचनावाद अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, कृतीशील शिक्षण व उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतात.

     आम्ही मुलांचा केवळ स्मरणाचा नव्हे तर आकलन, उपयोजन, विचारशीलता, सर्जनशीलता, कल्पकता अशा क्षमतांचा परिपूर्ण विकास व्हावा, बौद्धिक विकासाबरोबरच त्यांच्या शारीरिक कौशल्यांचा विकास आणि भावनिक अंगाचा परीपोष व्हावा हे व्यापक उद्धिष्ट ठेवून दर्जेदार शिक्षण देण्याची हमी देत आहोत, त्यासाठी आमच्या शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ‘नित्य नवा दिस जागृतीचा’ यानुसार दरदिवशी शालेय विकासाचे चित्र अधिकाधिक आकर्षक करत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे आणि आनंद आहे.

धन्यवाद !

सौ. शालिनी भागवत खरे.
मुख्याध्यापक